टाळेबंदी व उद्योगाच्या संधी : कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व उमेद अभियान (ता.उमरी) तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न
टाळेबंदी व उद्योगाच्या संधी : कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व उमेद अभियान (ता.उमरी) तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे गत दीड वर्षांपासून टाळेबंदी असल्याने अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये लघु उद्योजक अडचणीत आले. मात्र शेती, शेती पूरक व्यवसायह व प्रक्रिया उद्योग मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असल्याने हे सर्व उद्योग चालू असून याकडे संधी म्हणून पाहिल्यास निश्चितच ग्रामीण तरुणांना फायदेशीर ठरणार असल्याने संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राने उमेद अभियान (ता.उमरी) यांच्या सहकार्याने दि. २३ मे रोजी “टाळेबंदी काळात उद्योजकांना विविध संधी” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. यात प्रशिक्षणात डाळ प्रक्रिया, मसाला उद्योग, फळे व भाजीपाला प्रक्रिया, फळे व भाज्यांचे निर्जलीकरण, सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र, लाकडी घाण्यापासून शुद्ध तेल, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, पौष्टिक पापड व शेवया उद्योग, मशरूम उत्पादन इत्यादी अन्न प्रक्रिया उद्योग तर शेळीपालन, कुकुटपलान, दुग्ध व्यवसाय, रेशीम कोष निर्मिती, कोरफड प्रक्रिया, अगरबत्ती, मेणबत्ती, टेलरिंग व गारमेंट, फिनायील तयार करणे या इतर उद्योगांची माहिती देण्यात आली. यासह उद्योग निर्मितीसाठी आवश्यक कायदेशीर बाबी व परवाने आदी विषयावर चर्चा झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योग चालू असलेले तरुण तर काही व्यवसाय चालू करणारे सहभागी झाले होते. तरुण उद्योजक व महिला बचत गटातील सदस्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. आजपर्यंत एकून तीन प्रशिक्षण पूर्ण झाले असून यामध्ये जवळपास शंभरहून अधिक तरुण उद्योजकांनी सहभाग नोंदविला. ग्रामीण तरुणाईचा प्रतिसाद लक्षात घेऊन यापुढे प्रत्येक तालुक्यातून गरजेनुसार प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार असल्याचे कृषी विज्ञान केंद्रातर्फे सांगण्यात आले.
Comments
Post a Comment